दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली”; फडणवीसांच्या वाढदिवशी शिंदेंच्या भावना अनावर
मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
“आजचा दिवस एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू घेऊन आला आहे. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर चालत सुखी, समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, हीच प्रार्थना,” असे शिंदे म्हणाले.
अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, वक्तशीरपणा, जनतेसाठी झटण्याची वृत्ती आणि प्रशासनावरील प्रभावी पकड यांचा विशेष उल्लेख केला. अर्थमंत्री म्हणून महायुतीच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प तसेच शेती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा अभ्यास महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या विकासाची अनेक स्वप्ने आम्ही एकत्र पाहिली होती. मात्र नियतीने दादांना अकाली हिरावून नेले. त्यामुळे त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल, असेही शिंदे यांनी सांगितले.
आपल्या श्रद्धांजली संदेशाचा समारोप करताना त्यांनी भावनिक ओळींमधून अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
“दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील…
दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील.”
महायुतीतील सहकार्य, विकासाची समान दृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.