राष्ट्रवादीत सत्ता हस्तांतरण! सुनेत्रा पवार बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षा; सुनील तटकरे यांचा शरद पवार गटावर टोला

महाराष्ट्र राजकीय

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने झाला.

बैठकीत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला आणि त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. यावेळी सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना पक्षातील घडामोडींवर भाष्य केले.

“अजित पवारांना हिणवण्यात आले” – तटकरे

सुनील तटकरे म्हणाले, “२००४ मध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून निर्णय झाला असता, तर महाराष्ट्राने Ajit Pawar यांच्या रूपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री अनुभवला असता. मात्र तसं घडलं नाही. नेतृत्व ताकदवान होतं तेव्हा टीका होतेच. पण अजितदादांवर ज्या पद्धतीने टीका झाली, त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.”

ते पुढे म्हणाले, “२०१२ पासून ते आजपर्यंतच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या वादळात Sunetra Pawar यांनी सावलीसारखी साथ दिली. त्यामुळे अजित पवारांचा उत्तराधिकारी होण्याचा सन्मान त्यांचाच आहे.”

‘दुधवाला पण ६ वाजता उठतो’ – अप्रत्यक्ष टोला

लोकसभेनंतर अजित पवार यांचं राजकीय भविष्य संपल्याच्या चर्चा होत असल्याचा उल्लेख करत तटकरे म्हणाले, “मी तेव्हा म्हटलं होतं की महाराष्ट्रात ‘अजित पर्व’ सुरू होतंय. पण माझ्यावर टीका झाली. अजितदादांचं काम पहाटे ६ वाजता सुरू होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्यावरून ‘दुधवाला पण ६ ला उठतो, पेपरवाला पण उठतो’, अशा शब्दांत त्यांना हिणवलं गेलं.”तटकरे यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्यांवरचा अप्रत्यक्ष टोला मानलं जात आहे.

महायुतीत जाण्याचा निर्णय

२०२३ मध्ये राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी स्वतंत्र भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रफुल पटेल , छगन भुजबळ , सुनील तटकरे , हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, असेही तटकरे यांनी नमूद केले.सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे अजित पवार गटाला नवसंजीवनी मिळणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे