बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवत जिल्ह्यात लक्ष केंद्रीत केले होते. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर जिल्ह्याची घडी पुन्हा विस्कटण्याची चिन्हे दिसू लागल्याची चर्चा आहे. जिल्ह्याला पूर्वपदावर आणण्यासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील नेते आणि लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भेट घेत बीडमध्ये विशेष लक्ष घालण्याची विनंती केली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेत जिल्ह्यातील गंभीर प्रश्न मांडले.
मल्टिस्टेट सोसायट्यांतील घोटाळ्यांचा मुद्दा
बीडसह मराठवाड्यात अनेक मल्टिस्टेट सोसायट्यांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात आला. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
सुरक्षा आणि आरोपींच्या अटकेची मागणी
संतोष देशमुख हत्येनंतर धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांना जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरीय सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली.याशिवाय बीड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
भेटीमागे स्थानिक राजकारण?
दरम्यान, या भेटीमागे स्थानिक राजकारण असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. त्यांनी बीडच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला असला, तरी प्रशासनाचा अनुभव मिळण्यासाठी काही काळ लागू शकतो, असे बोलले जाते.
या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे पुन्हा जिल्ह्याची सूत्रे हाती घेऊ शकतात, अशी शक्यता गृहित धरतच धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, आर्थिक घोटाळे आणि विकासकामांचा प्रश्न आता थेट मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर पोहोचला असून पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.