मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य भ्रष्टाचाराबाबत ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवण्यात आले आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली.
यंदाही ‘खड्डेमुक्ती’साठी सुमारे ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर, “खड्डे कायम, खर्चाचा महामेळा” अशी तीव्र टीका करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
मुख्य आरोप
दरवर्षी खर्च, परिणाम शून्य : कोट्यवधी खर्चूनही पावसाळ्यात पुन्हा खड्डे निर्माण होत असल्याचा आरोप.
९० कोटींच्या निधीचा प्रश्न : यंदाच्या निधीचा स्पष्ट हिशोब उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
निकृष्ट कामांची पुनरावृत्ती : नव्याने केलेले डांबरी/काँक्रीट रस्ते अल्पावधीत खराब होत असल्याने गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न.
एकाच रस्त्यांवर वारंवार खर्च : विशिष्ट ठिकाणी पुन्हा पुन्हा कामे देऊन निधीचा अपव्यय झाल्याचा संशय.
टेंडर प्रक्रियेवर शंका : ठेकेदार निवडीत पारदर्शकतेचा अभाव व संगनमताची शक्यता.
अमोल मातेले यांची प्रतिक्रिया
“मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक करून ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ सुरू आहे. दरवर्षी नवे आकडे, नवे आश्वासन; पण रस्ते तेच खड्ड्यांनी भरलेले. हा प्रकार ‘वरून गोड, आतून सडलेला’ कारभार आहे,” अशी टीका त्यांनी केली.
प्रशासनाकडे प्रमुख मागण्या
मागील ५ वर्षांच्या खर्चाचा सविस्तर ऑडिट अहवाल जाहीर करणे
यंदाच्या ९० कोटी निधीचा कामनिहाय तपशील सार्वजनिक करणे
सर्व कामांवर तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणी सक्तीची करणे
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणे
जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी कारवाई
नागरिकांसाठी ऑनलाईन मॉनिटरिंग प्रणाली सुरू करणे
या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास कायदेशीर कारवाई, जनआंदोलन आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ‘खड्डेमुक्ती’ हा केवळ घोषणांचा विषय न राहता प्रत्यक्षात तो भ्रष्टाचाराचा संशयित मॉडेल बनत असल्याचा आरोप करण्यात आला असून, “जशी करणी तशी भरणी” या म्हणीप्रमाणे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.