मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित “लोकशाही वाचवा निर्धार सभा” मध्ये केंद्र सरकारवर लोकशाही संस्थांवर आघात केल्याचा आरोप करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी “वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकत्व चोरीचे संकट देशासमोर उभे ठाकले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे,” असे आवाहन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुषार गांधी उपस्थित होते. यावेळी सतेज (बंटी) पाटील, सचिन सावंत, चरणजित सप्रा, उल्का महाजन, तिस्ता सेटलवाड, चित्रा राणे आणि जयंत दिवाण यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मीनाक्षी नटराजन यांनी आपल्या राज्यसभा उमेदवारी अर्जाच्या रद्दबातल निर्णयावर टीका करत, हा केवळ वैयक्तिक अन्याय नसून लोकशाही प्रक्रियेवर घाला असल्याचा आरोप केला. उमेदवारी अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी समान संधी न दिल्याचा दावाही त्यांनी केला.हर्षवर्धन सपकाळ यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय असल्याचे सांगत, “देशात संविधानवादी आणि मनुवादी विचारांचा संघर्ष सुरू असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
सतेज (बंटी) पाटील यांनी लोकशाही संस्थांवर दबाव वाढत असल्याचा आरोप करत, १५ ते २५ वयोगटातील तरुणांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.तुषार गांधी यांनी देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत, संविधान व लोकशाही संस्थांच्या संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.सभेत उल्का महाजन आणि तिस्ता सेटलवाड यांनीही लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.