मुंबई: बोरीवली तहसीलदार कार्यालय येथील नागरी सेतू केंद्रात अधिवास प्रमाणपत्र (डॉमिसिले सर्टिफिकेट) अर्ज उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यानंतर आज सकाळी सुमारे ११.३० वाजता भेट दिली असता केंद्रात छापील अर्ज नसून समोरच्या झेरॉक्स दुकानातून अर्ज घ्यावेत, असे सांगण्यात आले.
यावेळी जवळच असलेल्या आशापुरा जंबो झेरॉक्स येथून १० रुपयांना अर्ज विकत घ्यावा लागला. संबंधित अर्जावर २३ एप्रिल २०२४ अशी तारीख असून त्याची झेरॉक्स प्रत देण्यात आल्याचे निदर्शनास आले.
मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०२५ मध्ये या नागरी सेतू केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आजतागायत केंद्रात छापील अर्ज उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या डिजिटल आणि सुलभ सेवा देण्याच्या दाव्यांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, नुकतेच विधानसभेत अस्लम शेख यांनी तहसीलदार कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, दलालांचे वाढते जाळे आणि सर्वसामान्यांना उत्पन्न व अधिवास दाखले मिळण्यात होणारी दिरंगाई याबाबत आवाज उठविला होता.या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, तसेच विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ॲड. संदेश कोंडविलकर
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस