मुंबई: दिल्ली निवडणूकीत कॉंग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच पुन्हा एकदा शिळया कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केल्याचा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.त्यावर आनंद परांजपे यांनी जोरदार टीका केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ३१ खासदार निवडून आल्यानंतर कधीही मतदारयादी सदोष आहे अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली नव्हती असा जोरदार प्रतिहल्ला करतानाच सन २०१९ च्या विधानसभेनंतर २०२४ च्या लोकसभेपर्यंत ३२ लाखच मतदार मतदारयादीत वाढले. आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत ३९ लाख मतदार वाढल्याचा आरोप केलात पण लोकसभेनंतर मतदारनोंदणीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि ज्यांना – ज्यांना विधानसभा लढायची आहे तो प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला व नवीन मतदारांची नोंदणी केली. त्यात कॉंग्रेसही मागे नव्हती. वाढलेले मतदान हे लोकसभेनंतर विधानसभेला वाढत असते याची जाणीव आनंद परांजपे यांनी करून दिली.
लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला त्यावर बोलताना कोविडमुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही त्यामुळे मतदार आकडेवारीमध्ये तफावत असू शकते. लोकसभेला जी मतदान केंद्रे होती त्यापेक्षा जास्त २५-३० मतदानकेंद्रे निवडणूक आयोगाने अधिक वाढवली होती. महाराष्ट्रातील शहरी भागात मतदान केंद्रे वाढवण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची यादी देखील वाढली हे स्पष्ट होते असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लोकसभेनंतर मिळालेल्या यशानंतर मतदारयादीबद्दल किंवा ईव्हीएमबद्दल कधीही कॉंग्रेसने किंवा त्यांच्या घटक पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही याबद्दलही आनंद परांजपे यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.