इयत्ता ११ वी प्रवेशाची विशेष फेरी जाहीर; २५ ऑगस्टला प्रवेश वाटप

महाराष्ट्र

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अंतिम संधी असून विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.

संचालनालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १५,५२,६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १३,४३,४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

या फेरीसाठी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध होईल. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजल्यापासून २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, भाग-१ मध्ये दुरुस्ती, भाग-२ भरणे आणि अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांना किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य राहणार आहे.

२५ ऑगस्ट रोजी प्रवेश वाटप करण्यात येणार असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता प्रवेश वाटपाची यादी आणि कट-ऑफ यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही प्रवेशाची माहिती देण्यात येणार आहे.

वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात २५ ते २७ ऑगस्टदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून शुल्क भरावे आणि प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी प्रशासकीय कामकाज, २९ ऑगस्ट रोजी डेटा प्रोसेसिंग आणि ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी जाहीर वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत