दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; अमित शाह यांची भेट, विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून त्या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

दिल्लीतील या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील काही नेत्यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली असून, हेच अजित पवार यांची इच्छा होती, असा दावा केला जात आहे.सध्या हा मुद्दा सार्वजनिक पातळीवर शांत असला तरी, सुनेत्रा पवार कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीत विलिनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.

राज्यसभा राजीनामा आणि पुढील रणनीती

सुनेत्रा पवार या सक्रिय राज्य राजकारणात येण्यापूर्वी राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून कोणाला संधी दिली जाणार, याबाबतही पक्षांतर्गत चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपाची भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे संभाव्य विलिनीकरण झाल्यास सत्ताधारी भाजपाशी चर्चा अपरिहार्य मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाजपाला माहिती देणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही वरिष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.