अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट…

महाराष्ट्र

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धावपट्टीच्या अगदी जवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर आली.

आजही अनेकांना ही घटना खरी वाटत नसून अजित पवार आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी ते बारामतीकडे रवाना झाले होते. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात विमान हवेत असतानाच एका बाजूला कोलमडताना स्पष्टपणे दिसत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीआयडीकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातासंदर्भात अजित पवार यांचे सचिव यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, याच कालावधीत पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेदही समोर आले.

ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरणावर मोठा परिणाम झाला. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात संयम ठेवत जोरदार प्रचार टाळला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेचे आभार मानले.

सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की,“जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.”

तसेच, “संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने काम करणाऱ्या पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचे विशेष आभार,” असेही त्यांनी नमूद केले.