कोल्हापूर जिल्ह्यातील २०,३१० रेशनधारकांचे धान्य बंद

महाराष्ट्र

शासकीय कर्मचारी, मृत लाभार्थी व सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हजार ३१० रेशनधारकांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिकांचा या कारवाईत समावेश आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला अन्नसुरक्षाअंतर्गत धान्य दिले जाते. यामध्ये केशरी, पिवळे आणि पांढरे अशा तीन प्रकारच्या शिधापत्रिकांचा समावेश आहे. केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानातून नियमित धान्य वितरित केले जाते. मात्र, यापैकी अनेक लाभार्थी हे शासकीय कर्मचारी असून त्यांची आर्थिक स्थिती सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ धान्य उचललेले नव्हते.

गेल्या काही वर्षांपासून आधार संलग्नता व बोटाचे ठसे (बायोमेट्रिक प्रणाली) वापरून धान्य वितरण होत असल्याने कोणत्या लाभार्थ्याने किती काळ धान्य घेतलेले नाही, याची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. याच माहितीच्या आधारे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र किंवा धान्य न घेणाऱ्या रेशनधारकांची यादी जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली.

या यादीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने २०,३१० रेशनधारकांचे धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापैकी कोणी पात्र लाभार्थी असल्याचा दावा करत पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यास, निकष तपासून त्यांच्या रेशनची सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.