रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली नाही, तर विकासाला वेग देणारी नवी कनेक्टिव्हिटी निर्माण केली,” असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे घाटातील ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे.या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार, शिवेंद्रराजे भोसले, भरत गोगावले, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, हा प्रकल्प “अभियांत्रिकी चमत्कार” असून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण करण्यात आला आहे. सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात ३० ते ४० मिनिटांची बचत होणार आहे. तसेच इंधन बचत, प्रदूषणात घट आणि अपघात कमी होण्यास मदत होईल.टायगर व्हॅली परिसरात १८२ मीटर उंच व्हायडक्ट उभारण्यात आला असून तो देशातील सर्वात उंच असल्याचा दावा करण्यात आला. अत्याधुनिक टनेल्स, सुरक्षा यंत्रणा आणि नियोजनामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित झाला आहे.
“जे अशक्य वाटत होते ते महायुती सरकारने करून दाखवले,” असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी पुढे सांगितले की, समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प पूर्ण करून राज्याला विकासाच्या नव्या गतीने पुढे नेण्याचे काम सुरू आहे.या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रासह लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार असून राज्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.