सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, राज्याने परकीय गुंतवणुकीसाठी मोठे उद्दिष्ट ठेवले असून दावोस जागतिक आर्थिक मंच येथे महाराष्ट्राने सर्वाधिक सामंजस्य करार करून देशात आपले अग्रस्थान टिकवले आहे. अपूर्ण जलप्रकल्प पूर्ण करून शेती क्षेत्राला चालना देण्यासह प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यावर शासनाचा भर आहे.
सातारा जिल्ह्यातील ‘मॉडेल स्कूल’ व ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांचे सादरीकरण थेट नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीतून ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू असून विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी पालकमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच कर्नल महाडिक स्मृती उद्यानात आदरांजली अर्पण केली.