मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. समृद्धी महामार्गात २० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू तसेच इतर घटनांमध्ये १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत त्यांनी या दुर्घटनांसाठी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराला जबाबदार धरले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याचे सांगून सरकारने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली, मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नाही. काँग्रेसचे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने अफवा पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर “सर्वात खोटारडे व्यक्ती” असल्याचा आरोप करत वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, तसेच लाडकी बहीण योजनेत २,५०० रुपये देण्याच्या आश्वासनांवरूनही सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सपकाळ म्हणाले की, अशा चर्चांची माहिती त्यांच्याकडे नाही. मात्र, भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येणे ही काँग्रेसची भूमिका असून देशात भाजपाला सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसच उभी राहू शकते, असा दावा त्यांनी केला.