सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशीच नव्हे, तर महाविकास आघाडीशी आणि जनतेशीही केलेली गद्दारी असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महायुतीच्या विरोधात जनतेने मतदान करून या खासदारांना विजयी केले होते. त्यामुळे त्यांच्या या कृतीला जनतेचा विश्वासघात मानत अशा गद्दारांना भविष्यात जनता धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, बंडखोरी करणारे हे सहा खासदार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रचार केला, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र आता त्यांनी केलेली बंडखोरी हा त्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अपमान आहे.

“पैशासाठी लाचार झालेले लोक जनतेची सेवा करू शकत नाहीत. ज्यांना फक्त पैशाचे आकर्षण असते, ते कोणाचेही नसतात,” अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. लोकशाही आणि संविधानिक मूल्ये पायदळी तुडवत भाजप ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांमध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर होत असून, विजय मिळवता आला नाही तर विजयी उमेदवारांना विकत घेण्याचा किंवा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

देशातील लोकशाही संस्थांवर दबाव निर्माण झाला असून विधिमंडळ, संसद आणि न्यायव्यवस्थेतही न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, सर्व संस्थांवर भाजपने कब्जा केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दहशतीच्या जोरावर राज्यकारभार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत