एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना
मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी राज्य शासनाने ‘विनोबा’ या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील २५ जिल्ह्यांतील सुमारे ४५ हजार शासकीय शाळा, १.३० लाख शिक्षक आणि ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन), शिक्षक सक्षमीकरण, जीवनकौशल्य विकास आणि पालक-शाळा संवादाला या व्यासपीठामुळे गती मिळाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय, एनएमएमएस आणि अन्य स्पर्धा परीक्षांसाठी सराव चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे संबंधित परीक्षांतील यशाचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक वाढले असून, एफएलएन उद्दिष्टांच्या पूर्ततेत २३ टक्क्यांची सुधारणा नोंदविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवादकौशल्य वाढवण्यासाठी कथाकथन, कविता सादरीकरण, स्पोकन इंग्रजी यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. दरमहा ५० हजारांहून अधिक विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी होत असून, ‘नन्हे सितारे’ व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी मिळत आहे.
याशिवाय ‘कॉफी विथ सीईओ’सह ११०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, डिजिटल प्रणालीमुळे शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजातील १.१ कोटी तासांची बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
नव्या कराराअंतर्गत पालक सहभाग, विद्यार्थी क्लब, माजी विद्यार्थी नेटवर्क, विद्यार्थी पोर्टफोलिओ आणि जीवनमूल्य शिक्षणासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मूल्यमापन सुविधेमुळे कविता, कथाकथन आणि स्पोकन इंग्रजीसारख्या उपक्रमांचे स्वयंचलित मूल्यांकनही शक्य होणार आहे. राज्यातील सार्वजनिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.