मुंबई: शिवसेना-मनसेची युती होत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठं विधान केले.
‘आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत. आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही करू. त्यामध्ये तिसऱ्याची काहीच गरज नाही.’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचसोबत, इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत, असं देखील त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर जोरदार टीका केली. ‘एकनाथ शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील. शिंदे मालकांना भेटत असतील तर आक्षेप नाही. यावर मी काय बोणार. गद्दार गद्दार असतो. गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर खोचक टीका केली.
व्हीव्हीपॅटसंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. ते म्हणाले की, ‘देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? ईव्हीएमबाबत संभ्रम असताना व्हीव्हीपॅट कशाला पाहिजे. व्हीव्हीपॅट बंद करता मग निवडणुका घेता कशाला? व्हीव्हीपॅट काढण्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका.’
तसचं, ‘सरकारला नितीमत्ता राहिली नाही. आताचे सत्ताधार फक्त मतलबी आहेत. देशाचे सरकार चालवतंय कोण? देशाला पंतप्रधानांची गरज आहे. मोदी, शहा हे देशाचे नाहीत तर भाजपचे प्रचारमंत्री आहेत. देशाला मजबूत पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज आहे. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा ते गायब होतात.’, अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला.
ट्रम्प यांनी मोदींना धमकी दिली यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींना शेतकरी आठवतात का? ट्रम्प आपल्या देशाची आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवत आहेत. आपल्या देशाला पंतप्रधान, पराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. उपराष्ट्रपती कुठे आहेत यावर चर्चा करा. पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नका. पाकिस्तान आपला शत्रू आहे. मग पाकिस्तानसोबत का क्रिकेट खेळत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.