पुणे: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मत पडली आहेत. त्यामुळे क्रॉस व्होटिंग झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. हे क्रॉस व्होटिंग महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी केल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तसेच इंडिया आघाडीच्या इतर देखील काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे बोलले जात आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या 4 ते 5, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 ते 3 आणि काँग्रेसच्या एका खासदाराने क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या सर्व आरोपांवर थेट भाष्य करत नेमकं कोणी क्रॉस व्होटिंग केलं याबाबत शक्यता व्यक्त केली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपराष्ट्रपतीपदासाठी झालेलं मतदान जर गुप्त होतं तर ती फुटलेली 15 मतं सेनेचे होती अथवा इतर कोणाची होती याबाबत कोणी ठामपणे कसं सांगू शकत.
जर कोणी सांगत असेल तर राहुल गांधी ज्या पद्धतीने वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्याच पद्धतीने या निवडणुकीत देखील वोट चोरी झाली का? असा प्रश्न निर्माण होतो. भारतीय जनता पक्षाचे नेते संजय जयस्वाल यांच स्पष्ट मत आहे की 40 मधील 11 मते जी वाएसआर काँग्रेसची आहेत.
वाएसआर काँग्रेस हा इंडिया आघाडीचा मित्र पक्ष नाही. गेली पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता. भाजपचा मित्र पक्ष यांच्या सोयीने बदलतो. जी 40 मतं आमच्या गळ्यात मारतात त्यातले 11 मत ही वाएसआर काँग्रेसची आहेत. भाजप सोयीप्रमाणे कधी जगन मोहन रेड्डी यांचा मित्र असतो तर कधी चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत असतो. त्यामुळे नक्की भाजप कधी कोणाबरोबर असतो हाच प्रश्न सातत्याने निर्माण होतो. माझा खूप साधा प्रश्न आहे देशाने मतदान केल ना जर हे सिक्रेट मतदान होतं. तर त्यांना कसं माहित कोणती मतं फुटली? आता राष्ट्रपतीना पत्र लिहावं लागेल की याच्यामध्ये काहीतरी गोलमाल दिसत आहे.
सत्तेतल्या लोकांना जर माहिती असेल कुठे मतदान झाले तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोट चोरी झाली आहे हे सिद्ध होईल. मात्र जे क्रॉस व्होटिंग झाले म्हणत आहेत. त्यांना गद्दारी केली ती फक्त मराठी माणसानेच केली असं म्हणायचं आहे का. 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरून महाराष्ट्राचीच फुटली आहेत? सगळं चुकीचं काम महाराष्ट्राचं करणार ही अशी बदनामी करत आहेत देशामध्ये राज्याची दुसरं कोणी फुटू शकत नाही? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.