नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी तसेच केंद्र सरकारविरोधातील काही मुद्द्यांवर राष्ट्रवादीची दिसून येणारी मवाळ भूमिका यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी NDAसोबत न जाता इंडिया आघाडीसोबतच राहावे, असे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस NDAसोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार हे विचारांनी डावीकडे झुकलेले नेते असून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी मनुस्मृती मानणाऱ्या विचारसरणीच्या लोकांसोबत जाऊ नये, असे चव्हाण यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंचे चव्हाणांना प्रत्युत्तर
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच चुकीच्या चौकटीत बसवतात. कदाचित महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा केंद्रातील नेत्यांशी योग्य समन्वय नसल्यामुळे असे घडत असावे, असे सुळे म्हणाल्या.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि NDAच्या संभाव्य हातमिळवणीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपण शरद पवारांविषयी भाष्य केले होते. तसेच आगामी काळात केंद्रातील सत्तेत बदल होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
‘२०२९ मध्ये मोदी पंतप्रधान राहणार नाहीत’
केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. येत्या काळात देशात सत्तांतर होण्याची शक्यता असून २०२९ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असे भाकीत त्यांनी केले.
चव्हाण यांच्या मते, गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हे सत्तांतर काँग्रेसमुळे होईल की अन्य कोणत्या राजकीय पक्षामुळे, हे सध्या सांगणे कठीण आहे. मात्र, सत्तांतराची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उपपंतप्रधान व्हायचे असल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी उधाण आले आहे.