अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यशिक्षण आधुनिक काळाची गरज; ह.भ.प. नवनाथ माशेरे

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): आधुनिक जीवनशैली अंगीकारताना मानवाने भौतिक विकासाकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन झी टॉकीज वरील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प नवनाथ महाराज माशेरे यांनी श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ येथे गणेशउत्सव काळातील व्याख्यानमालेत गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बोलताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश क्षीरसागर होते. शिवाजी महाराजांच्या काळात रयतेच्या गवताच्या काडीलाही हात न लावण्याच्या प्रशासनाला दिलेल्या सूचना समाजात सुसंस्कारित नागरिक बनण्यासाठी सतत प्रेरणा देत होत्या. आज आधुनिक काळात हे संस्कार कुमार अवस्थेतील मुलांसमोर ठेवणे गरजेचे असून मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर एकीकडे प्रचंड प्रगती केलेली आहे. परंतु जंक फूड व मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीसमोर आहारापासून विचारांपर्यंत सुसंस्कार करणे व त्यांना मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे.

भविष्यातील या कार्यकारी लोकसंख्येसाठी आजही शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी विभागलेल्या समाजाने एकत्र यावे व सामाजिक विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत. यासाठी गणेशोत्सवाची परंपरा सुरु केली. हया सामाजिक विकासाच्या कल्पनेतून प्रबोधन होणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाला उपप्राचार्य सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, एकनाथराव बगाटे, राहुल गायकवाड, रोहिदास चौधरी, आनंदा गावडे, मच्छिंद्र खेडकर, अण्णा ओहोळ, निळकंठ पाटील, काळूराम गव्हाणे, विद्यार्थी विकास मंडळाचे अरुण निकम, अतुल लिमगुडे, संदीप गवारे, सुनील जाधव, किरण रेटवडे, देवा शेळके ,कैलास सिनलकर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधूभगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष क्षीरसागर यांनी केले, तर आभार एकनाथ शिवेकर यांनी मानले.