मुंबई: लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर सोमवारी (28 जुलै) चर्चेला सुरुवात झाली. चर्चेला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळाले. याचदरम्यान, संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल प्रशंसा करताना सर्व खासदारांना टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत आणि हात बाकावर ठेवून बसले. या घटनेवरुन राहुल गांधींवर ‘देशद्रोही’ असल्याचा आरोप करत तीव्र टीका केली जात आहे.
राहुल गांधी आणि राजनाथ सिंहांमध्ये शाब्दिक चकमक
संरक्षण मंत्रालयाने आणि तिन्ही सेनादलांनी (भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, भारतीय नौदल) देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना राजनाथ सिंह यांनी हे आवाहन केले होते. या आवाहनानंतर, संसदेतील बहुतांश खासदारांनी टाळ्या वाजवून सैन्याच्या शौर्याला दाद दिली. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी शांतपणे बाकावर बसलेले दिसत असून त्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर राहुल गांधींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेक युझर्संनी त्यांना ‘देशद्रोही’ आणि ‘सैन्याच्या शौर्याचा अपमान करणारे’ असे संबोधले आहे. तर काही जणांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘देशभक्ती’ आणि ‘सैन्याचा सन्मान’ या मूल्यांवरुन त्यांना घेरले आहे. या घटनेवर राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, हा प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
हल्ल्याने पाकिस्तान हतबल
सिंह यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, भारतीय वायुसेनेच्या जोरदार हल्ल्यांमुळे सीमेवरील भूदलाच्या मजबूत प्रत्युत्तरामुळे आणि भारतीय नौदलाच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानला नमण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा हा पराभव केवळ लष्करी अपयश नाही, तर त्यांच्या सैन्यबळ आणि मनोबल या दोन्हीचा पराभव आहे.” 10 मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने (DGMO) भारतीय डीजीएमओंना फोनवर संपर्क साधला आणि लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली, असे त्यांनी सांगितले.
12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये औपचारिक चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी पुढे सांगितले. सिंह म्हणाले की, “परीक्षेत निकाल महत्त्वाचा असतो. आपण मुलाच्या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे, परिक्षेदरम्यान त्याची पेन्सिल तुटली होती याकडे नाही. निकाल हा आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आपल्या सैन्याने जे लक्ष्य निश्चित केले होते, ते पूर्णपणे साध्य करण्यात यश मिळवले.”