भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

महाराष्ट्र राजकीय

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे.

भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण भाजपच्या संमतीशिवाय शक्य नाही. “आम्ही सध्या महायुतीचा भाग आहोत. त्यामुळे कोणताही मोठा राजकीय निर्णय घेताना भाजप नेतृत्वाशी चर्चा करणे अनिवार्य आहे. भाजपला अंधारात ठेवून कोणताही निर्णय होऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा अपरिहार्य

“ज्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे हे राजकीय शिष्टाचाराला धरून नाही,” असे सांगत भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावीच लागेल, असे ठामपणे नमूद केले. विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“पवार एकत्र येण्याची इच्छा असू शकते, पण…”

ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना भुजबळ म्हणाले, “जसे ठाकरे एकत्र आले, तसे दोन्ही पवार एकत्र यावेत, अशी भावना असू शकते. मात्र अजितदादांच्या मनात तसा कोणताही विचार नव्हता. त्यांनी भाजपसोबत राहूनच काम करण्याचा ठाम निर्णय घेतला होता.”

अजितदादांनंतर नेतृत्वावर संकेत

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत बोलताना भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल, असे संकेत दिले. “आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील चर्चा होतील. काही निर्णय तात्काळ होतात, तर काही निर्णयांसाठी वेळ लागतो,” असे म्हणत त्यांनी घाई न करण्याचा सल्ला दिला.