स्वयंपाकासाठी बरेचजण प्लास्टीकची, एल्युमिनियमची भांडी वापरतात. पण या भांड्यांमध्ये अन्न शिवजणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. स्वयंपाकघरातील भांड्यांची निवड हा विषय आपल्या आरोग्याशी थेट जोडलेला आहे. आपण कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न शिजवतो, याचे गुणधर्म अन्नात उतरतात. त्यामुळे आरोग्यासाठी कोणती भांडी वापरावीत ते समजून घेऊ.
लोखंडी भांडी
लोखंडी कढई किंवा तवा वापरणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात अन्न शिजवल्यामुळे अन्नातील लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. ही भांडी टिकायला मजबूत असतात आणि उष्णता दीर्घकाळ टिकवून ठेवतात.
मातीची भांडी
आयुर्वेदानुसार मातीची भांडी स्वयंपाकासाठी सर्वात उत्तम मानली जातात. मातीच्या भांड्यांमध्ये अन्न हळूहळू शिजते, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होत नाहीत. मातीचा नैसर्गिक गुणधर्म अन्नातील आम्लता कमी करतो आणि जेवणाला एक वेगळीच चव देतो.
पितळ
जुन्या काळी पितळ आणि काशाच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायचा. पितळेच्या भांड्यात जेवण केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र, पितळेच्या भांड्यांना आतून ‘कल्हई’ असणे आवश्यक आहे, अन्यथा आंबट पदार्थांशी प्रक्रिया होऊन ते विषारी ठरू शकतात.
स्टेनलेस स्टील
आजच्या धावपळीच्या युगात स्टेनलेस स्टील हा एक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहे. हे धातू अन्नाशी कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. मात्र, घेताना ते जड आणि चांगल्या गुणवत्तेचे असावे याची काळजी घ्यावी.
स्वयंपाकासाठी कोणती भांडी टाळावीत?
ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवल्याने ते शरीरात हळूहळू साठत जाते, ज्याचा यकृत आणि किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. या भांड्यांवरील ‘टेफ्लॉन’ कोटिंग गरम झाल्यावर विषारी वायू बाहेर टाकू शकते, जे आरोग्यासाठी घातक आहे.
कोटिंग निघालेली नॉन-स्टिक भांडी कधीही वापरू नयेत. निरोगी आयुष्यासाठी आपण हळूहळू का होईना, पण पुन्हा एकदा पारंपरिक भांड्यांकडे वळणे गरजेचे आहे. लोखंडी आणि मातीची भांडी वापरणे हा आरोग्यासाठी केलेली एक उत्तम गुंतवणूक ठरेल.
(सोशल मीडियावरून साभार)