मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून तो आणखीन छान लागावा यासाठी आपण चहात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घालतो. चहा तयार करतांना आपण त्यात चहाचा मसाला, लवंग, आलं, दालचिनी असे अनेक पदार्थ घालतो. या पदार्थांमुळेच चहा एकदम स्वादिष्ट आणि फक्कड होतो
चहा आणि आलं यांचं फार पूर्वीपासूनचे नातं आहे. आलं घातलेला चहा प्यायल्याने अंगात तरतरीपणा येऊन फ्रेश वाटते. चहात आलं घातल्याने चहाची चव तर चांगली लागते सोबतच आल्यातील पौष्टिक गुणधर्म देखील आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात.
१) उन्हाळ्यात आल्याचा चहा प्यावा की पिऊ नये
आलं हे त्याच्या अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. आपल्या रोजच्या आहारात आलं असेल तर अन्नपदार्थ चांगल्या पद्धतीने पचनास मदत होते. यासाठीच, उन्हाळ्यात किंचित आलं घातलेला चहा आपण दिवसांतून फक्त २ वेळा पिऊ शकता. उन्हाळ्यात आल्याचा चहा आपण नक्कीच पिऊ शकतो परंतु तो पिण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आलं हे त्यांच्या चांगल्या गुणधर्मासोबतच, शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढवण्यास देखील कारणीभूत ठरु शकते. उन्हाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने काहीजणांना गॅस किंवा पोटदुखीसारख्या समस्या देखील सतावतात. यासाठीच उन्हाळ्यात आल्याचा चहा योग्य प्रमाणातच प्यावा.
२) आल्याचा चहा प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढते का
एका अहवालानुसार, आल्याचा चहा प्यायल्याने तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते. या अहवालात प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा आपण आले पाण्यात विरघळवून पितो तेव्हा शरीराचे तापमान वाढते. या संशोधनात असे म्हटले आहे की आल्याच्या अर्कामध्ये हायपरथर्मिक गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराची उष्णता वाढू शकते. यासाठीच, उन्हाळ्यात आल्याचा चहा पिणे शक्यतो टाळावे किंवा कमी प्रमाणांत प्यावा, तसेच चहात आलं देखील कमीच घालावे.
उन्हाळ्यात वजन कमी करा झरझर, खा ‘ही’ ६ फळ! खा मस्त व्हा तंदुरुस्त
३) उन्हाळ्यात आल्याचा चहा पिण्याचे दुष्परिणाम…
उन्हाळ्यात आल्याचा चहा जास्त प्रमाणांत प्यायल्यास शरीराच्या तापमानात असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप गरम वाटू शकते. शरीराच्या उष्णतेमुळे, तुमच्या पायांना जळजळ जाणवू शकते किंवा तुमच्या शरीरावर पुरळ देखील येऊ शकते. याशिवाय, पोटात वाढत्या उष्णतेमुळे काही लोकांना तोंडात अल्सर होऊ शकतात आणि शरीरावर पुरळ येणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जास्त आल्याची चहा प्यायल्याने ऊर्जा कमी होऊ शकते आणि उष्णतेमुळे थकवा वाढू शकतो.
४) उन्हाळ्यात आल्याचा चहा पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
उन्हाळ्यात कधीही रिकाम्या पोटी आल्याचा चहा पिऊ नका. दिवसांतून २ कपपेक्षा जास्त आल्याचा चहा पिणे टाळावे. आल्याचा चहा प्यायल्यानंतर जर तुम्हाला शरीरात उष्णता, घाम किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते पिणे टाळा.
(सोशल मीडियावरून साभार)