मुंबई: सह्याद्री आणि मेळघाटच्या दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये आता ‘लालपरी’चे चाक फिरणार आहे. राज्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक निर्णय परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.“आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे सांगितले.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस – विकासाची नवी वाट
राज्य परिवहन महामंडळाकडून ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस विशेषतः आदिवासी पाड्यांसाठी नियोजित आहेत.
स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत एसटी सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून सध्या सुमारे ९३ टक्के लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाट परिसरातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले होते. मोठ्या बसेसना प्रवेश शक्य नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार आहे.
पायवाटांवरून चाकवाटांकडे…
ही केवळ बससेवा नसून सामाजिक समावेशकतेचा महत्त्वाचा सेतू ठरणार आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ बस आशेचा किरण ठरणार आहे.मंत्री सरनाईक म्हणाले, “दुर्गम भागातील आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे.”
विकासाचा नवा संकल्प
‘लालपरी’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.