मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री आता संपुष्टात आल्याचं स्वतः सतीश पुळेकर यांनी कबूल केलं आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला, मात्र “एवढी चांगली मैत्री होती, ती संपली,” अशी खंत व्यक्त केली.
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटे यांनी नाना पाटेकरांबरोबरच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता, पुळेकर म्हणाले की, त्यांच्या खऱ्या मित्रांमध्ये शाळा, कॉलेज आणि क्लबमधील मित्र आहेत. या क्षेत्रातील खरा मित्र म्हणजे दिवंगत विनय आपटे असल्याचं त्यांनी सांगितलं.
यानंतर नाना पाटेकरांबद्दल विचारलं असता, पुळेकर म्हणाले, “हा विषय टाळलेलाच बरा. कारण इतकी चांगली मैत्री होती, ती आता संपली आहे.”
यावेळी त्यांनी संघर्षाच्या दिवसांतील अनेक आठवणीही सांगितल्या. नाना पाटेकर यांना नाटकात संधी मिळावी म्हणून आपणच त्यांची ओळख दिग्दर्शक जयदेव हट्टंगडी यांच्याशी करून दिली होती. तसेच ‘अविष्कार’ आणि ‘नाट्यकेदार’ संस्थांमध्येही आपणच नानांना घेऊन गेलो होतो, असा खुलासा त्यांनी केला.
विशेष म्हणजे, यापूर्वी नाना पाटेकर यांनीही संघर्षाच्या काळातील आठवणी सांगताना, “मी मुद्दाम जेवणाच्या वेळी सतीश पुळेकरांच्या घरी जायचो. सतीश घरी नसला तरी त्याची आई प्रेमाने जेवायला बसवायची,” असा भावनिक किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
सतीश पुळेकर यांच्या या वक्तव्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील एकेकाळच्या घट्ट मैत्रीमध्ये नेमका दुरावा कशामुळे आला, याबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.