पुणे-सोलापूर महामार्गावर बनावट फायनान्स टोळीचा धुमाकूळ; वाहनचालकांना अडवून मारहाण

क्राईम महाराष्ट्र

पुणे: पुणे सोलापूर हायवेवर वर बनावट फायनान्स कंपनीचे नाव सांगत वाहनचालकांना अडवून दमदाटी, मारहाण आणि लूटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटस टोलनाक्याजवळ थरारक प्रकार

२२ फेब्रुवारी रोजी Patas टोलनाक्यापासून ते यवत गावादरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कारसमोर गाडी आडवी लावून प्रवाशांना अडवले. “आम्ही फायनान्स कंपनीचे आहोत, तुमच्या गाडीचे हप्ते थकले आहेत,” असे सांगत त्यांनी प्रवाशांना धमकावले आणि मारहाण करत लूटमार केली.

या प्रकरणी अक्षय भाऊसाहेब सानप (वय ३०, रा. फातिमा नगर, पुणे) यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

‘फायनान्स’च्या नावाखाली खंडणी?

महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना हेरून, त्यांना अडवून धमकावत पैसे उकळण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या टोळीला काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अप्रत्यक्ष सहकार्य आहे का? असा संशयही वाहनचालकांकडून व्यक्त केला जात आहे.

वाहनचालकांनी संबंधित टोळीविरुद्ध खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

दिवसाढवळ्या महामार्गावर असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पुणे रूरल पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, तसेच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी विशेष मोहीम राबवून टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे.महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, तातडीने कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.