मुंबई: देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमधील दंगली ही त्याची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबईतील Tilak Bhavan येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणुकांपासून हिंदू-मुस्लीम द्वेषाचा अजेंडा राबवला जात आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशन प्रक्रिया सुरू होणार असून, त्या समितीत कोणत्या निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करायची हेही आधीच ठरवण्यात आल्याचा दावा सपकाळ यांनी केला. डिलिमिटेशननंतरच्या मतदारसंघांचा आराखडाही तयार असल्याचे ते म्हणाले.
तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी अभिनेता Joseph Vijay यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेते आणि पक्षश्रेष्ठींनी विचारविनिमयानंतर घेतल्याचे सांगितले. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या पक्षांसोबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई महानगरपालिकेतील कथित शौचालय बांधकाम भ्रष्टाचारावर टीका करताना सपकाळ यांनी भाजपावर निशाणा साधला. “भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच Mohit Kamboj यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.