मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींची सरशी
दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी पुन्हा एकदा उजवी ठरली आहे.
मुलांचा निकाल : 89.56 टक्के
मुलींचा निकाल : 94.96 टक्के
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.40 टक्क्यांनी अधिक राहिली.
कोकण विभाग अव्वल
राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून तो 97.62 टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के नोंदवण्यात आला.
इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे :
कोल्हापूर – 95.47 टक्के
मुंबई – 94.97 टक्के
पुणे – 94.24 टक्के
नाशिक – 90.53 टक्के
अमरावती – 90.50 टक्के
नागपूर – 89.07 टक्के
लातूर – 88.42 टक्के
श्रेणीनिहाय निकाल
प्राविण्यासह प्रथम श्रेणी – 27.41 टक्के
प्रथम श्रेणी – 31.26 टक्के
द्वितीय श्रेणी – 24.66 टक्के
उत्तीर्ण श्रेणी – 8.75 टक्के
‘एका परीक्षेवर आयुष्य ठरत नाही’
मंत्री दादाजी भुसे यांनी अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना धीर देताना, “एका परीक्षेचा निकाल तुमची बुद्धिमत्ता किंवा संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे,” असा संदेश दिला. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
गुणसुधार योजनेत तीन संधी
दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत पुढील तीन परीक्षांमध्ये पुन्हा बसण्याची संधी मिळणार आहे. जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 या परीक्षांमध्ये विद्यार्थी गुणसुधारासाठी अर्ज करू शकणार आहेत.