विकास लवांडे यांच्यावरील हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान; हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा;  हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची घटना ही भ्याड मानसिकतेचे प्रतीक असून हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विकास लवांडे हे वारकरी संप्रदायातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत असल्याची त्यांनी व्यक्त केलेली चिंता या हल्ल्यामुळे खरी ठरल्याचे दिसून येते.

सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना सांगितले की, मनुवादी विचारसरणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक संत-महात्म्यांना त्रास सहन करावा लागला. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील अन्यायाचाही त्यांनी उल्लेख केला.

नाशिकमधील TCS प्रकरणावर बोलताना सपकाळ यांनी संबंधित एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी केली. या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “कायद्याने त्याचे काम करावे, मात्र या विषयाचा राजकीय वापर थांबवावा,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गांधी भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली. काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत