दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

महाराष्ट्र

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास कार्यरत असलेल्या या शाळेत शेती, परसबाग, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आणि प्रयोगात्मक शिक्षण यांसारखे उपक्रम वर्षभर राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.

शिक्षक केशव गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या संवादात शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची माहिती घेतली. नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि ज्ञानवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता पाहून मंत्री भुसे यांनी विशेष समाधान व्यक्त केले. स्वच्छ गणवेश, व्यवस्थित कापलेले केस, कापलेली नखे आणि स्वच्छ शालेय परिसर याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी दादाजी भुसे म्हणाले की, “हिवाळी पाडा शाळेने शिक्षण, स्वच्छता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ शाळा, शिस्तबद्ध विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे.”

राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे, शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व शिस्तीच्या सवयी रुजाव्यात यासाठी अशा प्रकारचे नियमित आढावे आणि संवाद उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत