शिरुर (तेजस फडके): उसतोड मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून तब्बल 12 लाख 67 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याशी लेखी करार असल्याचे भासवत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर उसतोड मजूर न पुरविता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुधीर शिवाजी जाधव (वय 50, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेषराव गोपीनाथ जाधव, कार्तिक शेषराव जाधव आणि सुंदर उत्तमराव जाधव (सर्व रा. वंजारवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2025-26 च्या गाळप हंगामासाठी उसतोड मजूर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आरोपींनी फिर्यादीला दिले होते. यासाठी पराग अॅग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या साखर कारखान्याशी लेखी करार झाल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
फिर्यादीनुसार, आरोपी शेषराव जाधव यांच्या बँक खात्यावर 10 लाख 67 हजार रुपये, तर कार्तिक जाधव व सुंदर जाधव यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये स्वीकारले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण 12 लाख 67 हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र, त्यानंतर उसतोड मजूर उपलब्ध करुन दिले नाहीत. तसेच स्वीकारलेली रक्कमही परत न केल्याने फिर्यादीची आर्थिक फसवणुक झाली. हि घटना 24 जुलै ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडली. याप्रकरणी 29 जून 2026 रोजी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.