मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव केला. आठवले यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशा शब्दांत शिंदे यांनी गौरविले. राज्यातील १३ कोटी जनता तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांनी आठवले यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची १२ वर्षांची वाटचाल आणि रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची १० वर्षे हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अभिमानाचा टप्पा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या काळात आठवले यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सातत्याने काम केले. मागासवर्गीय विद्यार्थी, दिव्यांग, वृद्ध तसेच वंचित घटकांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविल्याचेही शिंदे म्हणाले.
ठाण्यात राबविण्यात आलेल्या सुमारे २,२०० लहान मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट उपक्रमाचा उल्लेख करत शिंदे यांनी समाजसेवा हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडल्याचे त्यांनी नमूद केले.
रामदास आठवले हे दलित पँथर चळवळीतून पुढे आलेले संघर्षशील नेतृत्व असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा गौरव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. संघर्ष असो, संसदेत प्रश्नांची प्रभावी मांडणी असो किंवा संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा असो, आठवले नेहमी अग्रभागी राहिले, असे शिंदे म्हणाले.
दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. “दलितांविषयीचे प्रेम त्यांच्या उरात आहे, म्हणूनच त्यांचे चाहते संपूर्ण देशभर आहेत. ते नीडर आहेत म्हणूनच ते मास लीडर आहेत,” असे शिंदे म्हणाले.
सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवले नेहमी तत्पर असतात. त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे दिल्लीतही त्यांचा वेगळा प्रभाव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आठवले यांच्या हजरजबाबी शैलीचेही शिंदे यांनी कौतुक केले. संसदेत तणावाचे वातावरण असतानाही आठवले उभे राहिल्यावर वातावरण हलके होते. त्यांच्या चारोळ्या आणि विनोदी शैलीमुळे सभागृहातील वातावरण प्रसन्न होते, असे शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी मिश्कील अंदाजात, “तुमच्या मंत्रिपदाला झाली दहा वर्षे, तुमची प्रगती पाहून आम्हाला होतो हर्ष,” अशी चारोळीही सादर केली.
रामदास आठवले यांच्या राजकीय दूरदृष्टीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, “अब की बार मोदी सरकार” हा जनादेश त्यांनी सर्वप्रथम ओळखला. विश्वास, मेहनत आणि मैत्रीचे राजकारण त्यांनी कायम जपले. कोणत्याही आघाडीत असले तरी त्यांनी राजकीय संबंध आणि मैत्री टिकवून ठेवली, असेही शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिंदे यांनी “हम नहीं छोड़ेंगे दोस्ती… रामदास भाई आगे बढ़ो, शिवसेना तुम्हारे साथ है,” अशी घोषणाही दिली. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “आपको मिलती रहेगी मंत्रीपद की गद्दी, क्योंकि आपके साथ हैं नरेंद्र मोदी,” असे म्हणत आठवले यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“समतेचा दिवा अखंड तेवत राहो, अन्यायाचा अंधार दूर होवो आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अधिक तेजस्वीपणे पुढे जात राहो,” अशा शब्दांत शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.