अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे आहे. तो गेल्या वर्षभरापासून लातूरजवळील हायवेवरील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता.
माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ज्ञानेश्वर आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरून अंबाजोगाईहून घाटनांदूरकडे जात होता. घाटनांदूर येथील साठे चौकात काही जणांसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. संशयितांनी धारदार चाकूने ज्ञानेश्वरवर सपासप वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हल्ल्यावेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला, तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी त्याच रुग्णालयात पाठवण्यात आला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.