मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

शिरूर तालुका

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

पाबळ (सुनिल जिते): मलठण–शिक्रापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे हा मार्ग अक्षरशः धोकादायक बनला असून दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

मलठण, शिक्रापूर आणि परिसरातील गावांतील हजारो नागरिकांचा या मार्गावर दररोज वावर असतो. शेतमालाची वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसेच रुग्णवाहिकांनाही खराब रस्त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाहनांचे नुकसान होत असून प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कामाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याची तक्रार केली आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेले काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि मार्ग सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत