मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशोत्सव काळात भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विधान भवन येथे आढावा बैठक घेतली.
या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे, विसर्जन स्थळांवरील सोयी-सुविधा, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा सचिन अहिर यांनी सविस्तर आढावा घेतला.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने विसर्जन मार्गांवरील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अहिर यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. तसेच विसर्जन घाटांवर पुरेशा प्रमाणात जीवरक्षक, प्रकाश व्यवस्था आणि प्रथमोपचार केंद्रे उपलब्ध ठेवण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी ‘एक खिडकी योजना’ अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी सूचनाही अहिर यांनी केली. परवानग्यांची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गणेशोत्सव काळात नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. नागरिक आणि गणेशभक्तांना यंदाचा उत्सव अधिक उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात साजरा करता यावा, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन सचिन अहिर यांनी केले.