विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्र

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सक्षम इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासह विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि नवउद्योग निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

या संदर्भात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या माध्यमातून कार्यरत तसेच प्रस्तावित इन्क्युबेशन यंत्रणा, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि स्टार्टअप निर्मिती याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विद्यापीठ-उद्योग-नवउद्योजक यांच्यात समन्वय

राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि नवउद्योजक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून महाराष्ट्रातील युवा शक्ती आणि नवकल्पनांना उद्योगाभिमुख दिशा देण्याचा प्रयत्न या धोरणातून करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी सक्षम इन्क्युबेशन परिसंस्था उभारल्यास राज्यात मोठ्या प्रमाणावर नवउद्योग तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्राला देशातील आघाडीचे स्टार्टअप हब बनविण्याच्या उद्दिष्टाला बळ देणारे हे राज्यस्तरीय धोरण ठरणार आहे. युवा नवकल्पकांना संशोधनापासून उद्योगनिर्मितीपर्यंत आवश्यक ते सर्व प्रकारचे पाठबळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कल्पना फक्त कागदावर नको; उद्योगात रूपांतराचे लक्ष्य

विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि संशोधन केवळ शैक्षणिक स्तरापुरते मर्यादित न राहता त्यांचे व्यवसाय, स्टार्टअप आणि उद्योगांमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आवश्यक मार्गदर्शन, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांशी समन्वय आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध करून देण्यावर मंत्री पाटील यांनी भर दिला.

विद्यापीठांमध्ये सक्षम आणि परिणामकारक इन्क्युबेशन व्यवस्था उभारणे, नवीन उद्योजक घडविणे, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि नवउद्योगांना बाजारपेठेशी जोडणे, या उद्देशाने राज्यस्तरीय धोरणाची रूपरेषा अधिक प्रभावी करण्याबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत