शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील, राज्यभरातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.

दादाजी भुसे म्हणाले की, वर्गखोलीत प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव हा शिक्षण विभागासाठी सर्वात मौल्यवान मार्गदर्शक आहे. शिक्षकांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अनुभवांच्या आधारे भविष्यातील शैक्षणिक धोरणे अधिक सक्षम व परिणामकारक करण्यात येतील.

शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून सुसंस्कारित, जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही भुसे यांनी नमूद केले. विचारमंथनातून आलेल्या सकारात्मक सूचना आणि शिफारसींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दिवसभर आयोजित कार्यशाळेत अध्ययन-अध्यापनातील प्रयोग, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, योग व अध्यात्म, शालेय सैनिकी शिक्षण, कला-क्रीडा-अभिनय उपक्रम, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी, आव्हाने आणि संधी या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत