धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी
मुंबई: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, परीक्षांतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी मुंबईत गांधी भवन ते भाजप कार्यालय असा मोर्चा काढला. मात्र, रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस खासदारांना दिलेल्या वागणुकीचाही तीव्र निषेध करण्यात आला. “मोदी हटाव, देश बचाव” आणि “जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की, परीक्षांतील अनियमितता आणि पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेला लाठीचार्ज आणि राहुल गांधींना दिलेली वागणूक हा केवळ एका नेत्याचा नव्हे, तर देशातील विद्यार्थ्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेसने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत तातडीने चर्चा घ्यावी तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व FIR आणि खटले मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
या आंदोलनात विजय वडेट्टीवार, नसीम खान, भाई जगताप, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, तुषार गांधी, राजन भोसले, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, अमित कारंडे, राणी अग्रवाल, झिशान अहमद, ब्रिज दत्त, आनंद सिंग यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले.
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.