ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राची तरुणाई ही राज्याच्या प्रगतीची सर्वात मोठी ताकद असून MPSC, UPSC आणि SSC सारख्या स्पर्धा परीक्षा केवळ सरकारी नोकरीचे माध्यम नसून नेतृत्व, लोकसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी व्यासपीठ आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अत्यल्प साधनांमध्ये कठोर परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआर परिसरातील तरुणांसमोर माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, स्टार्टअप, संशोधन आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध असल्याने त्यांच्या करिअरच्या निवडी वेगळ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धा परीक्षांमधील मर्यादित रिक्त पदे, भरती प्रक्रियेतील विलंब, परीक्षा वेळापत्रकातील अनिश्चितता आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या समस्येचे उत्तर समाजात मतभेद निर्माण करण्यात नसून अधिक पारदर्शक, वेगवान आणि परिणामकारक भरती व्यवस्था उभारण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने रिक्त पदांची नियमित भरती, स्पर्धा परीक्षांचे निश्चित वार्षिक वेळापत्रक, पारदर्शक निवड प्रक्रिया, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, ग्रामीण भागात दर्जेदार मार्गदर्शन केंद्रे तसेच प्रत्येक जिल्ह्यात करिअर समुपदेशन आणि मानसोपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

स्पर्धा परीक्षेतील यश-अपयश हे कोणत्याही एका समाजघटकाचा विजय किंवा पराभव नसून प्रत्येक यशस्वी अधिकारी हा संपूर्ण देशाचा लोकसेवक असतो, असे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांची जिद्द आणि शहरी विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता यांचा समन्वय साधल्यास महाराष्ट्राला अधिक सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्व मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत