पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

महाराष्ट्र

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार

मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात राज्य शासनाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, या निर्णयाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वागत केले आहे. अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या तांबे यांनी हा निर्णय प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत राज्य शासनाने समिती स्थापन केली असून, पुढील ६० दिवसांत समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना तांबे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून प्रकल्पाचा वस्तुनिष्ठ अभ्यास होऊन रेल्वेमार्गाला सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, आंबेगाव, राजगुरुनगर आणि चाकण मार्गे पुण्याला जोडणारा सरळ रेल्वेमार्ग उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरेल. उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती आणि व्यापाराला या मार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त पुणे–नाशिक महामार्गावर प्रस्तावित चक्काजाम जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नसून पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या समर्थनार्थ असून, राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला बळ मिळावे आणि केंद्र सरकारपर्यंत जनतेच्या भावना पोहोचाव्यात, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत