पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या देशव्यापी अभियानाचा चौथा कार्यक्रम येत्या शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील SSPM मैदानावर होणार आहे. विशेषतः मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिश्ती, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, दिप्ती चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
‘छात्रों की गुंज’ हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून सर्वांसाठी खुला असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. राजस्थानातील कोटा येथून या अभियानाची सुरुवात झाली असून त्यानंतर डेहराडून आणि प्रयागराज येथे कार्यक्रम झाले. पुणे हे या अभियानातील चौथे ठिकाण आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्कार दिले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली, अशा पुण्यात मुलींसाठी विशेष कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘परीक्षांमध्ये पेपरफुटीचे ग्रहण’
२०१४ पासून केंद्रातील भाजप सरकार बहुजनांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नीट, न्यायालयातील भरती परीक्षा, टीईटी यांसह विविध परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटना घडत असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या १२ वर्षांत १५४ वेळा पेपर फुटल्याचा आरोप करत या विषयावर संसदेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेसने केली होती; मात्र मोदी-शाह यांनी चर्चेपासून पळ काढल्याचे ते म्हणाले.
परीक्षा आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ अभियान सुरू केल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
फडणवीसांच्या टीकेला सपकाळांचे प्रत्युत्तर
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेला ‘जेन-झी’ संवाद निवडक विद्यार्थ्यांसाठी होता, असा आरोप करत ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे त्यांनी सांगितले.
“कार्यक्रमाला तरुणाईचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ राहुल गांधीच दिसत आहेत,” अशी टीका सपकाळ यांनी केली. तरुणांचा प्रतिसाद पाहून भाजपने तिरंगा यात्रा काढावी लागत असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘आरएसएसच्या शाखेत वंदे मातरम् सुरू करा’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही सपकाळ यांनी निशाणा साधला. स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेस गेल्या अनेक दशकांपासून ‘वंदे मातरम्’चे गायन करत असल्याचे सांगितले.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शाखेत ‘वंदे मातरम्’ गाण्यास सुरुवात करावी,” असे आव्हान सपकाळ यांनी दिले. काँग्रेसकडून स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी निश्चित केलेल्या ‘वंदे मातरम्’चेच गायन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाकडे आता पुण्यातील विद्यार्थी आणि तरुणाईचे लक्ष लागले आहे.