शहरांच्या बकालपणावर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ

महाराष्ट्र

मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे. गेल्या काही वर्षांत जाती-धर्माच्या मुद्द्यांना प्राधान्य देणारे राजकारण, पक्षफोडी आणि निवडणुकांमधील पैशांचा वाढता वापर यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. हे राजकारण बदलून शहरांचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्यासाठी ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन करण्यात आला आहे. हे व्यासपीठ केवळ काँग्रेसपुरते मर्यादित न राहता लोकचळवळ बनावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा ‘शहर परिवर्तन गटा’चे अध्यक्ष सचिन सावंत यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सचिन सावंत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे, अॅड. संदेश कोंडविलकर, दिनेश कांबळे, प्रशिक्षण विभाग प्रमुख आशुतोष शिर्के यांच्यासह MMR विभागातील विविध शहरांचे काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि विविध जनसंघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले.

पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य अन् कचरा व्यवस्थापनावर भर

सचिन सावंत म्हणाले की, ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर वाढत असल्याने शहरांचा विस्तार वेगाने होत आहे. त्यामुळे नागरी पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, सक्षम सार्वजनिक वाहतूक, दर्जेदार आरोग्य व शिक्षण सुविधा आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन मिळणे ही शहर विकासाची प्राथमिक गरज आहे.

मात्र, या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी जाती-धर्माच्या मुद्द्यांवर राजकारण करून जनतेचे लक्ष मूलभूत प्रश्नांपासून विचलित करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तज्ज्ञ, तरुण आणि Gen Z ला सहभागी होण्याचे आवाहन

शहरातील नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य व सुरक्षित करण्यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन करण्यात आला आहे. शहरी नियोजन तज्ज्ञ, व्यावसायिक, विद्यार्थी, तरुण, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि विविध जनसंघटनांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या गटाचा शुभारंभ करण्यात आला. राजीव गांधी यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. आजच्या वेगाने बदलणाऱ्या शहरी भारताकडेही त्याच दूरदृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, नागपूरपासून सुरुवात

‘शहर परिवर्तन गट’ हे केवळ काँग्रेसचे व्यासपीठ न राहता शहरांच्या विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुले व्यासपीठ असेल, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई, पुणे आणि नागपूर येथे आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून आगामी काळात राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. शहर परिवर्तन ही केवळ राजकीय मोहीम न राहता नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ बनविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत