मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानकच अस्तित्वात नव्हते, असा दावा राऊत यांनी केला. “मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा कोणी आणून दिला तर मी राजकारण सोडेन,” असे आव्हानही त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते, असा दावा केला जातो, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हते. १९७१ च्या आसपास गुजरातमध्ये ते स्टेशन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे मोदींनी चहा कुठे विकला, असा प्रश्न उपस्थित होतो.”
“मोदी स्वतःला नॉन-बायोलॉजिकल म्हणवतात. मग जे आईच्या गर्भातून आलेले नाहीत ते शाळेत कसे जातील आणि चहा कसे विकतील?” असा टोला राऊत यांनी लगावला.फडणवीस यांच्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे आणि समाजात धर्म-जातीच्या आधारावर भेद निर्माण करण्याचे काम करू नये, असे ते म्हणाले.
‘महिला आरक्षणाचे विधेयक पुन्हा कसे आणणार?’
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. २०२३ मध्ये संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याचा संदर्भ देत त्यांनी, “२०२३ सालचे विधेयक पुन्हा आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? एकच विधेयक दोनदा कसे जाहीर होणार?” असा सवाल केला.
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेची अट जोडण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रॅपिडोमुळे रिक्षाचालक संकटात
रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅपआधारित प्रवासी सेवांमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला.
“राज्यात हजारो रिक्षाचालक मराठी आहेत. रॅपिडो बाईक रिक्षामुळे त्यांचा व्यवसाय संकटात आला आहे. या रिक्षाचालकांशी चर्चा करूनच अशा सेवांना परवानगी द्यावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिल्याचेही राऊत यांनी सांगितले.दरम्यान, राऊत यांच्या या आरोपांवर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.