डॉक्टरांचा निष्काळजीपणा! छातीतील वेदना दुर्लक्षित केल्याने तरुणाचा मृत्यू…

क्राईम महाराष्ट्र

नातेवाइकांची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे: छातीत तीव्र वेदना होत असलेल्या ३० वर्षीय तरुणाला औंध येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी हृदयविकाराची शक्यता नाकारत पित्त व मळमळीचे निदान करून वेदनाशामक उपचार करत घरी पाठवले. घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.ममतानगर, जुनी सांगवी येथील सुमीत श्रीकांत गद्रे (सोनावणे) (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. सांगवी पोलिसांनी तक्रार नोंदवून ससून रुग्णालयातील तज्ज्ञांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

तक्रारीनुसार, रविवारी पहाटे ३.४० वाजता सुमीतच्या छातीत वेदना सुरू झाल्याने त्याला औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन कक्षातील कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याची ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राफी) तपासणी केली. मात्र ईसीजी सामान्य असल्याचे सांगत हृदयविकाराची शक्यता नाकारण्यात आली. प्रत्यक्षात पित्ताचा त्रास असल्याचे निदान करत पोटदुखीची गोळी तसेच मळमळ, चक्कर आणि वेदना कमी करणारी इंजेक्शन्स देण्यात आली. वेदना कमी झाल्यानंतर सुमीतला घरी पाठवण्यात आले.

घरी गेल्यानंतर सुमीत लघुशंकेला जाऊन आला आणि काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला. नातेवाइकांनी तातडीने त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची भूमिका जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी सांगितले की, “जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ केवळ नावालाच आहेत. योग्य वेळी रुग्णाला ससून किंवा हृदयविकार उपचार सुविधा असलेल्या रुग्णालयात पाठवले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता.” मृत सुमीतचा भाऊ विवेक गद्रे म्हणाला, “माझ्या भावावर योग्य उपचार झाले असते तर तो आज जिवंत असता. तो महाविद्यालयात शिपायाचे काम करत होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.”