एका कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): शेताच्या वाटेच्या वादातून एकाच कुटुंबावर पाच जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव सांडस येथे घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. प्रशांत सुरेश रणदिवे (वय 34, व्यवसाय – शेती, रा. रांजणगाव सांडस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ गुलाबराव शितोळे, तानाजी बाळासो शितोळे, संभाजी दशरथ शितोळे, नंदकुमार बाळासो शितोळे व बाळासो गुलाबराव शितोळे (सर्व रा. रांजणगाव सांडस) या पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रणदिवे व त्यांचे वडील शेतात जात असताना वादग्रस्त रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी रस्ता आमच्या बापाचा नाही असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी लाथाबुक्यांनी व लाकडी काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी प्रशांत यांना गुडघ्यावर, नाकावर आणि छातीवर गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांचे वडील सुरेश रणदिवे, आई सुमन रणदिवे व चुलते मधुकर रणदिवे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात रणदिवे कुटुंबातील चार जण जखमी झाले असून, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस फौजदार बनकर आहे.