‘कमळी’तील अन्नपूर्णा आजींचा प्रवास: टीकेपासून आत्मविश्वासापर्यंत!

मनोरंजन

मुंबई: कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने ठरलं तर मग ला तगडी स्पर्धा देत टीआरपीच्या शर्यतीत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील कमळीप्रमाणेच घराची कर्ती, जबाबदार आणि कणखर अन्नपूर्णा आजींची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

अन्नपूर्णा आजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी साकारली आहे. मालिकेत त्या आपल्या हरवलेल्या नातीच्या शोधात असल्याचं दाखवलं आहे. मात्र, आज ज्या भूमिकेसाठी त्यांचं कौतुक होतंय, त्याच ईला भाटे यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला कडव्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अनुभव सांगितला. १९८९ साली त्यांनी ‘दुसरा सामना’ हे नाटक केलं होतं. हे नाटक कलावैभव या संस्थेचं होतं. प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांनी लेखन केलं होतं, तर दिग्दर्शन वामन केंद्रे यांनी केलं होतं. या नाटकात विक्रम गोखले आणि विनय आपटे प्रमुख भूमिकेत होते. त्या दोघांची मैत्रीण अशी ईला यांची भूमिका होती.

भूमिका लहान असली तरी महत्त्वाची होती. सुरुवातीला त्यांच्या मेहनतीचं आणि व्यक्तिमत्त्वाचं कौतुक झालं. पण त्याच वेळी त्यांच्या आवाजावर कठोर टीका झाली. “आवाज अनुनासिक आहे, सुखद नाही,” अशी टीका ऐकून त्या खचल्या होत्या. कारण त्यांना तेव्हाच जाणवलं होतं की त्यांना अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे.

मात्र त्यांनी हार मानली नाही. स्वतःतील उणीव स्वीकारत त्यांनी त्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. आवाज सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत विचारपूस केल्यानंतर त्यांना संगीततज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांचं नाव सुचवण्यात आलं.

विक्रम गोखले त्यांना डॉ. रानडे यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी तब्बल ३० सत्रांमध्ये ईला भाटे यांना आवाज जोपासना शास्त्र शिकवलं. या प्रशिक्षणामुळे फक्त त्यांचा आवाजच बदलला नाही, तर अभिनयाकडे पाहण्याची सखोल दृष्टीही मिळाली. आजही त्या त्यांच्या मार्गदर्शनाचा सराव करतात.टीकेला संधीमध्ये बदलत, स्वतःवर काम करत यश संपादन करणाऱ्या ईला भाटे यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.