रांजणगाव-कारेगाव गटात कमळाचा झंझावात; घड्याळाची टिकटिक बंद…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुकाच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘कमळ’ वादळासारखे फुलले, तर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळाची टिकटिक मतदारांनी थेट बंद केली आहे’. हा निकाल म्हणजे केवळ पराभव नाही, तर राष्ट्रवादीच्या अहंकाराला बसलेली जबरदस्त चपराक असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

या गटात राष्ट्रवादीची मक्तेदारी होती. मात्र प्रत्यक्षात ही मक्तेदारी पक्षाअंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायामुळे संपुष्टात आली. “सत्ता आमचीच” या भ्रमात राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना यावेळी जनतेने जागा दाखवून दिली असल्याचे बोलले जात आहे. या गटात एकाच घरातील दोन चुलत जावा जिल्हा परिषदसाठी एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या. त्यामुळे प्रचारादरम्यान सोशल मिडीयावर दोन्ही बाजुने प्रचंड मोठया प्रमाणात एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टिका करण्यात आली.

राष्ट्रवादी पक्षाकडुन जिल्हा परिषदसाठी ज्योती पाचुंदकर तर दोन पंचायत समिती गणासाठी महेश फंड आणि कारेगावच्या सरपंच निर्मला नवले या उभ्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाकडुन जिल्हा परिषदसाठी स्वाती पाचुंदकर तर दोन पंचायत समिती गणासाठी सागर देवकर आणि माजी पंचायत समिती सदस्या मनिषा पाचंगे या उभ्या होत्या.

परंतु जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्याच नाराज कार्यकर्त्यांची फौज, कारेगावच्या सरपंच पदाच्या वादामुळे स्थानिक पातळीवर झालेली बंडखोरी आणि मतदारांचा संताप या सगळ्याचा स्फोट मतदानातून झाला. त्यामुळे भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले. हा निकाल जाहीर होताच परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आनंदोत्सव साजरा केला.

एकीकडे “रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला सुरुंग लावला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा पराभव म्हणजे धोक्याची घंटा आहे. रांजणगाव-कारेगाव गटातील हा निकाल म्हणजे भाजपच्या राजकीय वर्चस्वाची नांदी आणि राष्ट्रवादीच्या अस्ताची हि सुरुवात असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.

(क्रमशः)