शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनने केवळ अल्पावधीत आरोपींना गजाआडच केले नाही तर चोरट्यांकडून दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत करून ते संबंधित महिलेस परतही दिले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(दि. 4) जून २०२५ रोजी दुपारी सुमारास वडगाव रासाई येथील शांभवी किराणा दुकानात फिर्यादी सुरेखा अनिल कुंभार (वय ४६) दुकानात काम करत असताना दोन अज्ञात इसमांनी फिल्मी पद्धतीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.
यातील एकाने दुकानात ग्राहक असल्याचे भासवून पाण्याची बाटली मागितली व फिर्यादी पैसे परत करत असतानाच तिच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीचे (१ तोळा ८ ग्रॅम वजनाचे) मिनी गंठण हिसकावून पळ काढला. बाहेर त्याचा साथीदार विनानंबरच्या दुचाकीवर थांबलेला होता. दोघेही तत्काळ पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी महिलेच्या मुलाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते फरार झाले. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ३८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, पोलीस अंमलदार पवन तायडे तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. काटेकोर गुप्त माहितीच्या आधारे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आरोपी मारूती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. निंबाळी, ता. आष्टी, जि. बीड),शरद बापु पवार (रा. लोणी सयदमिर, ता. आष्टी, जि. बीड)यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
सदर मंगळसूत्र न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी सुरेखा अनिल कुंभार यांच्याकडे अधिकृतपणे सुपुर्द करण्यात आले. महिलेला तिच्या आयुष्यातील अमूल्य असलेले दागिने परत मिळाल्याने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, पोलीस हवालदार बापु मांगडे व पोलीस अंमलदार पवन तायडे यांच्या मेहनतीमुळे हा गुन्हा उघडकीस आला. शिरूर पोलिसांनी केलेल्या या तत्पर व धाडसी कारवाईमुळे महिलेला तिचे मंगळसूत्र परत मिळाले असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.