शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालकीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी आरोपी भागा हरी भाईक आणि विश्वनाथ भागा भाईक (दोघे रा. साबळेवाडी, ता. शिरूर) यांनी संगनमताने शासकीय खर्चातून उभारण्यात आलेले तार कंपाऊंड आणि चर हे तोडून उध्वस्त केले. सदर तोडफोडीमुळे एकूण अंदाजे २४,६००/- रुपये किमतीचे शासकीय नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३३३, ३२४(४)(५), ३(५) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होण्याची तारीख १० जून असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.